‘जीवन के सफर में राही’
अरुण पुराणिक - रविवार, २६ डिसेंबर २०१०
वयाच्या चौदाव्या वर्षी, १९४१ साली नॅशनल स्टुडिओजच्या ‘राधिका’ चित्रपटाद्वारे पडद्यावर आलेल्या नलिनी जयवंत या फिल्मी दुनियेतील अभिनेत्रीचे अलीकडेच वार्धक्याने निधन झाले, गिरगावातल्या पाच नलिनींपैकी त्या एक.. काळाच्या पडद्याआड गेलेल्या या अभिनेत्रीविषयी..
पूर्वीच्या काळात आपली भावी पत्नी कशी असावी याचे सुरेख वर्णन देवलांच्या शारदा नाटकात पाहायला मिळते.
‘सुंदर खाशी सुबक ठेंगणी, स्थूल व कृशहिन वय चौदाची’ हे वर्णन चपखलपणे शोभून दिसते अशी नलिनी जयंवत वयाच्या चौदाव्या वर्षी, १९४१ मध्ये नॅशनल स्टुडिओजच्या ‘राधिका’ चित्रपटाद्वारे पडद्यावर आली. त्यावेळची आठवण सांगताना नलिनीताई सांगत होत्या. छोटय़ा नूतनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या आतेबहिणीने शोभना समर्थने घरी पार्टी ठेवली होती. त्या पार्टीमध्येच वीरेन्द्र देसाईने मला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली.
मजा म्हणजे त्या काळात गिरगावातल्या पाच नलिनी, सर्वच्या सर्व मराठी, फिल्मी दुनियेत होत्या. नलिनी जयवंत, नलिनी तर्खड, नलिनी नागपूरकर, नलिनी बोरकर, नलिनी ढेरे व नलिनी गुप्ते! नंतरच्या काळात नलिनी सराफ (सीमा) व नलिनी चोणकरही आल्या.
त्याच वर्षीच्या ‘निर्दोष’मध्ये मुकेश तिचा नायक होता. गायक अभिनेता मुकेशचा हा पहिलाच चित्रपट! यामध्ये नलिनी जयवंतनी मुकेशबरोबर युगल गीतही गायले होते. ‘तुम्हीने मुझको प्रेम सिखाया’. गोरी गोमटी काया, काश्मिरी गुलाबासारखे टवटवीत मुखकमल! अशा या लाघवी गोंडस व्यक्तिमत्त्वानी चित्रपट दर्शकांना भुरळ घातली नसती तरच नवल! या गुलजार पाखरावर कुणाची नजर पडण्याआधीच तिचे पहिले निर्देशक वीरेंद्र देसाईबरोबरच तिचा विवाह झाला. हा विवाह अल्पकाळ टिकला.
‘अनोखा प्यार’ (१९४८) मध्ये लताच्या आवाजाची आणि तिच्या अभिनयाची गट्टी जमली व एका नवीन पर्वाला सुरुवात झाली. अनोखा प्यार, समाधी, संग्राम, नौजवान, जादू, काफिला, नौबहार, २६ जनवरी, सलोनी, जलपरी, नाज, शिकस्त, मुनीमजी, रेल्वे प्लॅटफॉर्म यातील लताच्या गाण्यांना तिने अभिनयाने दाद दिली, तर लताच्या गाण्यांनी तिचा अभिनय खुलविला. दोघींना जणू नियतीने खास चित्रपट शौकिनांसाठी एकाच वेळी जन्माला घातले. पडद्यावरील लतानी गायलेली नलिनी जयवंतची गाणी आठवली, तर आजही अंगावर रोमांच उभे राहतात. ‘ठंडी हवाए, लहराके आए’ (नौजवान), ‘लो प्यार की हो गई जीत’ (जादू), ‘एरी मैं तो प्रेमदिवानी’ (नौबहार), ‘हाए जिया रोए’ (मिलन), ‘आ की अब आता नही दिलको करार’ (मेहबूबा).
‘नास्तिक’ (१९५५) या नलिनी जयवंतच्या सर्वात गाजलेल्या चित्रपटात तिने सादर केलेली धार्मिक वृत्तीची साधी, भोळी रमा न विसरता येण्याजोगी होती. वृंदावनच्या पवित्र वातावरणात, ‘कान्हा बजाए बन्सरी’ या सुरील्या रासनृत्यातून निरागस मोहक रमाचे, नलिनी जयवंतचे प्रथम दर्शन घडले. लताच्या आवाजात ‘हे ब्रह्मा, हे विष्णू, हे शंकर सर्व शक्तिमान रक्षा करो, हे दयानिधान’ ही परमेश्वराला घातलेली आर्त साद अंगावर रोमांच फुलविते. सुबोध मुखर्जींच्या ‘मुनीमजी’ (१९५५) मधील सचिन देव बर्मनजी शास्त्रीय रागावर दिलेल्या ‘घायल हिरनीया मैं बन बन डोलू’ गाण्याविषयी नलिनी जयवंत सांगत होत्या, मी नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षम घेतलेले नाही. तसेच पूर्वी नायिकेला मार्गदर्शन करायला आजच्यासारखे नृत्यदिग्दर्शक नव्हते. जसे जमेल तसे गाण्यानुरूप नायिकेला नृत्य करावे लागत असे. गाण्याच्या शेवटी उत्कंठावर्धक प्रसंगी खरोखर वाघ येतो व नायिका भेदरून हळूहळू मागे सरकते असे दृश्य आहे. निबीड जंगलात जाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी वाघाच्या गुरगुरण्याचा भास झाला आणि मी घाबरून खरोखरच धडपडले व मस्तपैतकी आपला गुडघा फोडून घेतला. देव आनंदच्या या नायकप्रधान चित्रपटात माझी भूमिका दुय्यम होती. त्याच वर्षीच्या ‘पेइंग गेस्ट’मध्ये सुबोध मुखर्जींनी माझ्याऐवजी नूतनला नायिका म्हणून घेतले. नूतन त्यावेळी नवीन होती व फार सुंदर दिसत होती. मुळात आमची पुरुष प्रधान इंडस्ट्री आहे. इथे एकाच हिरॉईनबरोबर नेहमी काम करायला हिरोंना कंटाळा येतो. मग तो देव आनंद असो, अशोक कुमार असो की दिलीप कुमार! नवीन नवीन सुंदर मुखडय़ाच्या तरुण नायिकांना घेऊन इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची किंमत वाढविण्याचा हिरोंचा सतत प्रयत्न चालू असतो. नटय़ांना असा चॉईस नसतो! मिळतील त्या भूमिका स्वीकाराव्या लागतात. ‘नायिका’ म्हणून माझे चित्रपट गाजत असतानाही ‘काला पानी’मध्ये मी दुय्यम नायिकेची भूमिका केली होती.
‘नजर लागी राजा तोरे बंगले पर’ हे गाणे त्यामध्ये मधुबाला असतानाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले होते. कारदारच्या ‘जादू’ (१९५१) चित्रपटाच्या वेळी ज्येष्ठ वादक कलाकार कॉवर्स लॉर्ड हे कॅस्टनेट हे नवीन लॅटिन अमेरिकन मुठीत धरून वाजवायचे वाद्य घेऊन आले होते. ते ‘टिकटिक’ वाजणारे वाद्य घेऊन ‘लारा लू, लारा लू’ गाण्यावर नलिनीनी अप्रतिम बॅलेनृत्य केले आहे. ‘समाधी’मधील लिल्ली (नलिनी जयवंत) व डॉली (कुलदीप कौर) चा ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ हा पाश्चात्य डान्सही त्या काळात खूप गाजला होता.
फिल्मीस्तानच्या दुर्गेश नंदिनीमध्ये नलिनी जयवंतनी नायकावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुस्लिम शाहजादीची आगळीवेगळी भूमिका केली होती. ‘हम सब चोर है’मध्ये किरकोळ शरीरयष्टीचा तलवारकट मिशीवाला, लाजरा-बुजरा शम्मी कपूर अभिनय निपुण नलिनी जयवंतचा नायक म्हणून .. दिसत होता. ‘तुमसा नहीं देखा’मध्ये शम्मी कपूरचा पुनर्जन्म झाला. ‘हम सब चोर है’च्या वेळची आठवण नलिनीताई सांगत होत्या, यातील सर्व गाणी ध्वनिमुद्रित करून झाल्यावर फिल्मीस्तानमध्ये निर्देशक आय.एम. जौहरनी ती गाणी मोठय़ा कौतुकानी ज्येष्ठ अभिनेत्री व निर्माती शोभना समर्थना ऐकविली. मी व संगीतकार ओ.पी. नय्यर मागेच कोपऱ्यात बसलो होतो. ‘अटंम फंटम छोड दे बाबू’ मिस्टर बॅनो, मिस्टर टँगो यासारखी नीरस, बेचव आणि अर्थहीन गाणी शोभनाताईंना बिलकूल आवडली नाहीत. गाणी ऐकून त्यांनी ‘क्या बकवास म्युझिक आहे’, म्हणून शेरा मारला. नय्यर मनोमन हिरमुसले, परंतु त्यावेळी गप्प बसले. पब्लिकनी ‘मर्कटलीला’ असलेल्या करमणूक प्रधान चित्रपटाचे भरघोस स्वागत केले. यातली गाणीही सर्वत्र लोकप्रिय झाली. शोभनाताई म्हणाल्या ते खोटे नव्हते. त्याचबरोबर यातील अर्थहीन गाणीही लोकप्रिय झाली ते ही खरेच होते. थोडक्यात पब्लिकला कधी काय आवडेल हे आधी कुणीच नक्की सांगू शकत नाही.
नलिनी जयवंतच्या डोळ्यात विलक्षण जादू होती. ती नजरेने बोलत असे. आजची आघाडीची नायिका काजोल हिने मिश्किल हास्य जरी तनुजाकडून घेतले असले, तरी तिची नजरेला नजर भिडवून, डोळे मोठे करून बोलण्याची लकब, नजरेतील कधी खटय़ाळ, अवखळ, तर कधी निष्पाप, लहान मुलासारखे निरागस भाव मावशी नलिनी जयवंतची आठवण करून देतात. नलिनी जयवंतसारखी हरहुन्नरी नायिका क्वचितच पाहायला मिळते. अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका करून नलिनीताईंनी चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकला. नलिनी जयवंत आणि अशोक कुमार ही दोन्ही चित्रपट सृष्टीतील माझी दैवते! फिल्मी उद्योगातून ते दोघेही निवृत्त झाले तरी मी मात्र कायम त्यांच्या संपर्कात होतो. नलिनीताईंना घेऊन दहा वर्षांंपूर्वी आम्ही सांताक्रुझ जिमखान्यात लता मंगेशकर यांचा वाढदिवस साजरा केला होता. नलिनीताई १, युनियन पार्क चेंबूरला, तर अशोक कुमार ४७, युनियन पार्कला राहात होते. ही ‘सी’ रोप सोसायटी असल्यामुळे त्यांचे बंगले एकमेकांच्या समोर होते. अशोक कुमार यांच्या वृद्धापकाळात मी त्यांच्या घरी जात असे. त्यांना बंगल्यात पहिल्या मजल्यावर ठेवले होते. घरी फक्त स्वीय सेक्रेटरी खुर्शीद, डॉक्टर, नर्स आणि एक नोकर! एकदा गप्पा मारून घरी निघत असताना, माझे हात हातात घेऊन ते मला मिष्किलपणे म्हणाले, ‘अरुण जा रहे हो? आपको मालूम है ना, सामने नलिनी रहती है। एक जमाने में हमारा अफेअर था। बिलकुल अकेला हूं और यहाँसे हिल भी नहीं सकता हूं। उसको बोलो और कुछ नहीं, तो कभी अपनी टेरेसमें तो आके खडी रहो।’ नलिनी जयंवतही वृद्धापकाळात एकटय़ाच राहात होत्या. काही काळ त्यांना प्रभू दयाळ या जुन्या अभिनेत्याची सोबत होती. घरात आठ-दहा कुत्री त्यांनी पाळली होती. बेल वाजविल्यानंतर कुत्र्यांना बांधून पंधरा मिनिटांनी त्या दार उघडत. मी त्यांना अशोक कुमारचा निरोप सांगितला. त्यांचा राग बहुधा निवळला नव्हता. त्या फणकाऱ्याने म्हणाल्या, ‘आता चाळीस वर्षांंनी त्यांना माझी आठवण झाली का?’ मी त्यांना घरी काम करण्यासाठी एक विश्वासू मोलकरीणही मिळवून दिली होती. ९५ च्या निवडणुकीत त्यांनी बीजेपीच्या उमेदवारालाही मदत केली होती. मात्र अलीकडच्या काळात त्यांची स्मरणशक्ती गेली होती. फोनसुद्धा त्या घेत नसत, चुकून घेतला तर नीट बोलत नसत. बाह्य जगाचा संपर्क त्यांनी जवळजवळ तोडून टाकला होता. माझे सुद्धा जाणे-येणे बंद झाले होते आणि आता अचानक बातमी आली. नलिनीताई गेल्या. चित्रपट क्षेत्रातील एक पर्व संपले. कुणालाही काहीही न कळविता, शांतपणे त्यांनी जगाचा निरोप घेतला.‘जीवन के सफर में राही, मिलते है बिछड जाने को और दे जाते हैं यादें तनहाई में तडपाने को’
http://www.loksatta.com/index.php?option=c...5&Itemid=13